गजानन gajanan maharaj
गजानन gajanan maharaj

श्री गजानन महाराज स्तोत्र | Gajanan maharaj stotra

astrologer

श्री गजानन महाराज स्तोत्र | Gajanan maharaj stotra

श्री गजानन महाराज का यह स्तोत्र भक्तों को शांति, समृद्धि और संकटों से मुक्ति दिलाने वाला है।

।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।

गजानन gajanan maharaj
गजानन gajanan maharaj

हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति |

साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१||

जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य |

तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२||

तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर |

साकाररुप सर्वेश्र्वर | विश्र्वनाथ तूंच की ||३||

जे जे काही म्हणावें | तें तें तुझे रुप बरवें |

दासगणूस आतां पावे | हीच आहे याचना ||४||

तूंच काशी विश्र्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार |

महंकाल तेवि ओंकार | तूंच की रे त्र्यंबकेश्र्वरा ||५||

भीमाशंकरा मल्लिकार्जुन | नागनाथ पार्वतीरमण |

श्रीघृणेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूंच की ||६||

तूंच परळी वैजनाथ | निधीतटाला तूंच स्थित |

रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७||

हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदधना |

हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८||

तूं वृंदावनीं श्रीहरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं |

व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमाजीं जगन्नाथे ||९||

द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण |

जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०||

आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साहय करा |

हेंच मागें पसरुनि पदा | तुज विठठले दासगणू ||११||

गजानन जे स्वरुप कांही | तें तुक्याविण वेगळे नाही |

दत्त भैरव मार्तड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२||

या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन |

माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३||

हें महालक्ष्मी कुलदेवते | कृपाकटाक्षें लेकरातें |

पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ||१४||

आतां श्रीशंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर |

निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ||१५||

हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता |

करितों होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका ||१६||

हे शिडी।कर बाबासाई | लेकरांसाठी धांव घेई |

वामनशास्त्री माझे आई | माझी उपेक्षा करुं नका ||१७||

हे शेगांवीच्या गजानना | महासंत्ता आनंदघना |

तुला येऊं दे काहीं करुणा | या अजाण दासगणुची ||१८||

तुम्हां सर्वा प्रार्थून | स्तोत्र करितो हे लेखन |

माक्या चित्तीं म्हणून | वास आपण करावा ||१९||

जे जे तुम्ही वदवाल कांही | तेंच लिहीन कागदीं पाहीं |

स्वतंत्रता मलजा नाही | मी पोषणा तुमचना असें ||२०||

माघमांसीं सप्तमीस | वद्यपक्षीं शेगांवात |

तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष | पंथाचिया माझारी ||२१||

उष्टया पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून |

मिळालें की नामभिमान | पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||

उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती |

तुम्ही साच गुरुमूर्ती | लपून बसाया कारणे ||२३||

परि विचारवंत जे ज्ञानी | तें तुम्हालागी पाहुनी |

भ्रमा हातफळी देऊनी | पाय तुमचे वंदितात ||२४||

बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर |

भ्रमातें सारुन दूर | शरण आले तुम्हांला ||२५||

बंकटलालाचें सदनास | तुम्ही राहिला कांही दिवस |

तेथे जानराव देशमुखास | मरत असतां वांचविले ||२६||

केवळ पाजुनियां तिर्था | आपुल्या पदींचे समर्था |

तुजलागी दंडवता | असो आमुचा बरचेवर ||२७||

तुझीया लिलानिधीचा | नच लागे पार साचा |

टिटवींने सागाराचा अंत कसा घेववेल ? ||२८||

पितांबरा देऊनी भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला |

जल तें हो आणविण्यांला | तहान लागली म्हणून ||२९||

पितांबरासी बजाविलें | ओंजळीनें पाणी भले |

न पाहिजेतुंवा भरले | या माझिया भोपळयांत ||३०||

जलांत तुंबा बुडवावा | जलें पूर्ण भरुन घ्यावा |

आणि तोच मला आणून द्यावा | यांत अंतर करुं नको ||३१||

तुंबा बुडेल ऐंसे पाणी | नव्हते नाल्यालागुनी |

विश्र्वास ठेवलोनिया वचनीं | ऐसे केलें पितांबरे ||३२||

नाल्याचिया जलास | तुंबा तो लावितां सरसी |

आपोआप त्या ठायासी | भव्य खांच पडली की ||३३||

तुंबा त्यांत भरत आला | ऐशी तुझी अगाध लिला |

ती साच वर्णण्याला | शेषही थकेल वाटते ||३४||

सोमवारी प्रदोषांसी | बंकटलालच्या सदनरासी |

भाविकां आपण व्योमकेशी | दिसतसां महाराजा ||३५||

यात नवल ना तिळभर | कां की तूंच शंकर रमावर |

हे जेवढे चराचर | तेवढे तुम्हींच आहात की ||३६||

तुझे स्वरुप यथातथ्य | मानवासी नाहीं कळत |

म्हणून पडती भ्रमांत | मायावधहोऊनी ||३७||

प्रातः कालाचे वेळीं | संपली होती दिवासही |

जानकीराम देईना मुळीं | विस्तव तुमच्या चिलमिस ||३८||

जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्र्वानर |

द्यावयासी कुरकुर | करुं लागला असे की ||३९||

तें अंतज्ञानी जाणून | कौतुक दाविले करुन |

चिलीम विस्तवांवाचून | पेटूनिया दाविली ||४०||

सोनार विस्तव देण्यांला | नाहीं ऐसे वदला|

म्हणूनिया येता झाला | राग भगवंताकारणें ||४१||

चिंचवणे ते सोनाराचें | नासलें अक्षय तृतीयेचें |

प्राणघातक किंडयांचे | झालें त्यांत साम्राज्य ||४२||

अवघे टकमका पाहती | नाका पदर लाविती |

एकमेकां सांगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||

मग जानकीराम म्हणाला | साधूस वितव ना दिला |

त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन ||४४||

मग तात्काळ उठून वेगेंसी | आला बंकटलाल सदनासी |

हकीकत बंकटलालासी | सर्व केली निवेदन ||४५||

बंकटलालाचे वशिल्यानें । चरण धरिलें सोनारानें ।

अनन्यभाव भक्तीनें । गजाननाचे तेधवां ।।४६।।

गुरुराया अंतर । मऊ आपले साचार ।

तेंच का हो केले कठोर । मजविषयीं समर्था ।।४७।।

आता या चिंचवण्यासी । हात लावा पुण्यराशी ।

त्याविण मी सदनासी । न जाय येथून ।।४८।।

ऐसी त्याची ऐकून गिरा । चिंचवण्याशी लाविले करा ।

चिंचवणें तेच झारा झरा । अमृताचा विबुधहो ।।४९।।

यापरी जानकीराम शरण आला । अखेर आपुल्या पदाला ।

मुकीनचंदु कृतार्थ केला । खाऊन दोन कान्हवले ।।५०।।

माधव नामें चिंचोलीचा । ब्राम्हाण एक होता साचा ।

त्यास बोध अध्यात्माचा । तुम्हीच एक केलात ।।५१।।

भ्रांती त्याची उठविली । प्रपंच माया तोडिली ।

मोक्ष पर्वणी लाधली । तया माधवाकारणें ।।५२।।

ऐसें आपुलें महिमान । श्रेष्ठ आहे सर्वाहून ।

पदरी असल्या विपुल पुण्य । पाय तुझे सांपडती ।।५३।।

वसंत पूजेकारण । घनपाठी ब्राह्मण ।

आणविलेत आपण । ऐनवेळीं तेधवां ।।५४।।

बंकटलालें आपणांसी । नेलें खावया मक्यासी ।

आपुलिया मळयासी । अति आग्रह करुनी ।।५५।।

मोहळें होती मळयांत । मधमाशांची भव्य सत्य ।

तीं पेटविता आगटीप्रत । उठतीं झालीं निजलीलें ।।५६।।

मधमाशाशी पाहून । लोक करिती पलायन ।

भय जिवाचें दारुण । आहे की प्रत्येकाला ।।५७।।

तुम्ही मात्र निर्धास्त । बैसता झाला मळयांत ।

मधमाशा अतोनांत । बसल्या तुमच्या अंगावरी ।।५८।।

लोक दुरुन पाहती । परी न कोणाची होय छाती ।

तुम्हां सोडावया गुरुमूर्ती । मधमाशांच्या त्रासांतून ।।५९।।

बंकटलाल दु;खी झाला । पाहून त्या माशांला ।

त्यांनी मात्र थोडा केला। प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा ।।६०।।

कांही वेळ गेल्यावरी । तुम्हीच आज्ञा केली खरी ।

मधमाशांस जाया दुरी । तें अवघ्यांनी पाहिलें ।।६१।।

आपुल्या आज्ञेनुसार । मधमाशा झाल्या दूर ।

बंकट म्हणे सोनार। आणवितों कांटे काढावया ।।६२।।

कां कीं मधमाशांचे काटे । रुतले असतील मोठें ।

ते लपून बसती बेटे । स्वामी अवघ्या शरीरांत ।।६३।।

म्हणून ते काढावया । सोनार आणवितो ये ठायां ।

आपण म्हणालात वाया । हा त्रास घेऊ नका ।।६४।।

योगशास्त्र येतें मला । मी योगबलें कांटयाला ।

बाहेर काढितो त्याजला । सोनार कशास पाहिजे ।।६५।।

ऐसें वदून कुंभक केला । तेधवा कीं आपण भला ।

तेणें बाहेर कांटयाला । पडणें अवश्य झाले की ।।६६।।

हे कौतुक सर्वांनी । पाहिलें त्या ठिकाणी ।

जो तो मनुष्य जोडी पाणी । स्वामी आपणांकारणे ।।६७।।

आपण म्हणाला त्यावर । हे जीवांनो घटकाभर ।

बैसा या वृक्षावर । आतां कोणास चावूं नका ।।६८।।

संकल्प बंकटलालाचा । पूर्ण करणें आहे साचा ।

सोहळा मका सेवण्याचा । निर्विघ्न त्याचा होऊं द्या ।।६९।।

पहा माशा उठतां क्षणी । तुम्ही गेलात पळूनी ।

संकट येतां नाही कोणी । तारिता हे ध्यानी धरा ।।७०।।

लाडू, पेढे खावयास । लोक जमती विशेष ।

परी साह्य संकटास । कोणीही करीना ।।७१।।

हें तत्व ध्यानी धरा । ईश्र्वरासी आपुला करा ।

म्हणजे सफल होय खरा । तुमचा की संसार ।।७२।।

ऐसा उपदेश भक्ताप्रती । साच केलात गुरुमूर्ति ।

एक्या मुखें करुं किती । मी आपुलें वर्णन ।।७३।।

कृष्णाजीचें मळयांत । दांभिक गोसावी आले बहुत ।

जे होते सांगत । शुष्क वेदांत जगाला ।।७४।।

त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी । महंत आणिला वाटेवरी ।

जो जळत्या पलंगावरी । तुम्हांजवळ ना बैसला ।।७५।।

चहूंकडून होता पेटला । तो अग्नी आपण शांत केला ।

तेणें त्या ब्रह्मगिरीला । कौतुक अति वाटले ।।७६।।

सर्व अभिमान सोडून । आपणां तो आला शरण ।

अग्नीचें ते अग्नीपण । चांदण्यापरी केलें तुम्ही ।।७७।।

टाकळीकर हरिदासाचा । घोडा अति द्वाड साचा ।

तुम्ही हरविला तयाचा । द्वाडपणा तो क्षणात ।।७८।।

घोडा आज्ञेंत वागला । तो सर्वांनी पाहिला ।

अशक्य कांही आपणाला । नाही उरलें जगांत ।।७९।।

अडगांव आकोली गांवांत । कावळे शिरतां भंडा-यात ।

आपण पळविले क्षणांत । आज्ञा त्यासी करुन ।।८०।।

अजूनपर्यंत त्या ठायी । कावळा ये ना एकही ।

संत जे वदतील कांही । खोटे होय कोठून ।।८१।।

प्रखर असुनी उन्हाळा । निर्जनशा काननाला ।

ऐन दुपारचे समयाला । कौतुक केले अभिनव ।।८२।।

अकोलीच्या रानांत । सर्व्हे नंबर बावन्नात ।

एका शुष्क गर्दाडाप्रत । बनविली तुम्ही पुष्करिणी ।।८३।।

भक्त आपुला पितांबर । कृपा होती त्याचेवर ।

तयाचाही अधिकार । थोर आपण बनविला ।।८४।।

ज्योतीप्रत मिळाल्या ज्योत । भेद कांही न तेथे उरत ।

खराच पितांबर पुण्यवंत । साक्षात्कारी जाहला ।।८५।।

वठलेल्या आंब्याला । त्यांनी आणविला पाला ।

कोंडोली ग्रामाला । हे कृत्य झालें कीं ।।८६।।

भीमा अमरजा संगमासी । क्षेत्र गाणगापुरासी ।

पर्णे फुटलीं टोणप्यासी । नरसिंह सरस्वती कृपेने ।।८७।।

तेंच कृत्य कोंडोलीतें । करविले पितांबरा हातें ।

आपणची गुरुमुर्ते । हे स्वामी समर्था ।।८८।।

वद्य पक्षांत माघमासी । सोमवतीच्या पर्वासी ।

क्षेत्र ओंकारेश्वरासी । गेले असतां भक्त तुमचें ।।८९।।

तेथे महानदी नर्मदेंत । नौका फुटली अकस्मात ।

पाणी येऊं लागलें आंत । नांव बुडूं लागली ।।९०।।

त्या नौकेंत आपण होतां । म्हणून नर्मदा लावी हातां ।

फुटलेल्या ठायी तत्वतां । ऐसा प्रभाव आपुला हो ।।९१।।

नौका कांठास लाविली । नर्मदेनें आणून भली ।

आपणां वंदून गुप्त झाली । हें बहुतांनी पाहिलें ।।९२।।

त्र्यंबक पुत्र कवराचा । आपुला भक्त होता साचा ।

जो अभ्यास वैद्यकीचा । हैद्राबादी करीत असे ।।९३।।

त्याची कांदा भाकर। आपण केली गोड फार ।

पदार्थ सारूनियां दूर । इतरांनी आणलेले ।। ९४।।

जैसा द्वारकाधीश भगवान । कौरवांचे पक्वान्न ।

सांडूनिया भक्षण । करी विदुर कण्यांचे ।।९५।।

तैसेच आपण केलें । कवराचें अन्न भक्षिलें ।

ख-या भक्तीचें भुकेले । आपण आहा महाराजा ।।९६।।

सवडदचा गंगाभारती । तया फुटली रक्तपिती ।

तो त्रासून जिवाप्रती । आला असतां आपणाकडे ।।९७।।

लोक अवघे तिटकारा । करुं लागलें त्याचा खरा ।

कोणी न देती त्यास थारा । रोगभयें करुन ।।९८।।

त्या गंगाभारतीस । येऊं न देती दर्शनास ।

कोणी आपल्या शेगांवास । ऐसी स्थिती जाहली ।।९९।।

लोक म्हणती तयाप्रत । मिसळू नकोस लोकांत ।

त्रास न द्यावा यत्किंचित् । तूं समर्थाकारणें ।।१००।।

तो गोसावी एकें दिवशी । आला आपल्या दर्शनासी ।

डोई ठेवतां पायांसी । मारिले आपण तयाला ।।१।।

थोबाड झोडिलें दोन्हीं हातें । लाथ मारुन कमरेंते ।

उलथून पाडिला रस्त्याते । थुंकून त्याच्या अंगावरी ।।२।।

बेडका पडतां अंगावर । गंगाभारती हर्षला फार ।

म्हणे आतां होईल दूर । व्याधी माझी नि;संशय ।।३।।

जो बेडका होता पडला । तोच त्यानें मलम केला ।

अवघ्या अंगास लाविला । चोळचोळूनीया  निज हातें ।।४।।

ऐशा रितीं सेवा करित । राहिला गोसावी शेगांवांत ।

तयाच्या महारोगाप्रत । आपण कीं हो निवटिलें ।।५।।

तुमच्या कृपेचिया पुढें । औषध काय बापुडे ।

अमृत तेंही फिके पडे । ऐसा महिमा अगाध ।।६।।

कोणतेंही संकट जरी । येऊन पडले भक्तांवरी ।

ते निजकृपेनें करीतां दुरी । आपण साच दयाळा ।।७।।

संकटीं खंडू पाटलाप्रत । आपण देऊन कृपेचा हात ।

न्यायाधिशाचें कचेरींत । निर्दोष त्यासी सोडिलें ।।८।।

बाळकृष्ण रामदासी । होता बाळापूर ग्रामासी ।

त्या माघ वद्य नवमीसी । समर्थदर्शन घडविलें ।।९।।

घटकेंत दिसावा गजानन । घटकेंत सूर्याजीपंत नंदन । घटकेंत भजन तें गणगण।घटकेंत जयजय रघुवीर असे ।।११०।।

तेणें बाळकृष्ण घोटाळला । अखेर ओळखून आपणांला ।

समर्थ म्हणूनी नमस्कार केला । काय लीला वानूं ती ।।११।।

संत अधिकारें समान । मुळीं न तेथे  अधिक न्यून ।

जैसें भक्तांचे इच्छी मन । तैशी रुपे दिसती तया ।।१२।।

गणेशदादा खापर्डे । उमरावतीचे गुहस्थबडे ।

कुपादृष्टीने त्यांकडे । पाहिले आपण सर्वदा ।।१३।।

या खापडर्याला व-हाड प्रांती । अनभिषिक्त राजा बोलती ।

राष्ट्रोध्दाराची तळमळ ती । होती खापडर्याकारणें ।।१४।।

कोठे न आले अपयश त्याला। हा तुमच्या कृपेचा महिमा झाला ।

बाळ गंगाधर टिळकाला । तुम्हीच कृपा केलीत ।।१५।।

भगवंतानें अर्जुनाला । भगवद्गीतेचा उपेदश केला ।

ज्या गीतेने जगाला । थक्क करुन सोडिले ।।१६।

पार्थ देवाचा भक्त जरी । राहिला वनवासाभीतरी ।

बारा वर्षे कांतारीं । ऐसें भागवत सांगते ।।१७।।

भगवंताचा वशिला । प्रत्यक्ष असून अर्जुनाला ।

वनवास तो नाही चुकला । तैसेच झाले टिळकांचे ।।१८।।

संतकृपा असून । शिक्षा झाली दारुण ।

ब्रम्ह्मदेशीं नेऊन ।मंडल्याशीं ठेविलें त्या ।।१९।।

श्रोतें त्याच मंडाल्यांत । गितारहस्य केला ग्रंथ ।

जो आबालवृद्वांप्रत । मान्य झाला सारखा ।।१२०।।

कोल्हटकरा हातें भला । आपण होता पाठविला ।

भाकरीच्या प्रसादाला । मुंबईत टिळकाकारणें ।।२१।।

फळ हें त्या प्रसादाचें । गीतारहस्य होय साचें ।

भाष्यकार गीतेचे । हे सहावे झाले की ।।२२।।

पहिले शंकराचार्य गुरुवर । दुसरे रामानुजाचार्य थोर ।   मध्व, वल्लभ त्यानंतर । भाष्यकार जाहलें ।।२३।।

पांचवी ज्ञानेश्वर माऊली । भावार्थदीपिका टिका केली ।

जी मस्तकी धारण केली । अवघ्या मुमुक्षु जनांनी ।।२४।।

ज्ञानेश्र्वरा नंतर । एक दोन टीकाकार ।

झाले परी ना आली सर । त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची ।।२५।।

वामनाची यथार्थदीपिका । तैसाच गीतार्णव देखा ।

हेहीं ग्रंथ भाविका । कांही अंशें पटले कीं ।।२६।।

गीतेचा अर्थ कर्मपर । लावी बाळ गंगाधर ।

त्या टिळकांचा अधिकार । वानाया मी समर्थ नसे ।।२७।।

मागील टीका समयानुसार । अवतरल्या या भूमीवर ।
तैसाच आहे प्रकार । या गीतारहस्याचा ।।२८।।

त्या  लोकमान्य टिळकांवरी । आपण कृपा केली खरी ।

म्हणून तयाचा झाला करी । गीतारहस्य महाग्रंथ ।।२९।।

खामगांवी डॉक्टर कवरा । तीर्थ आणि अंगारा ।

आपण नेऊन दिलांत खरा । ब्राह्मणाच्या वेषानें ।।१३०।।

ज्यायोगें व्याधी त्याची । समुळ हरण झाली साची ।

तुम्ही काळजी भक्तांची । अहोरात्र वहातसां ।।३१।।

कन्या हळदी माळयाची । बायजा नामें मुंडगांवची ।

ही तुमच्या कृपे जनीची । समता पावती झालीसे ।।३२।।

वरदहस्त बायजाशिरीं । तुम्ही ठेवितां निर्धारी ।

तिही झाली अधिकारी । केवळ तुमच्या कृपेनें ।।३३।।

मुंडगांवच्या पुंडलीकाला । होता जरी प्लेग झाला ।

तो येता दर्शनाला । व्याधी दुर्धर हरिली तुम्ही ।।३४।।

सद्भक्त  बापुन्याप्रती । तुम्ही भेटविता  रुक्मिणीपती ।

नाहीं अशक्य कोणती । गोष्ट आपणांकारणे ।।३५।।

एके वेळी आपणांला । गोपाळ बुटी घेऊन गेला ।

भोसल्याच्या नागपूराला । अती आग्रह करुन ।।३६।।

गोपाळ बुटी श्रीमंत भारी । हजारों पंक्ती त्यांचे घरीं ।

उठूं लागल्या वरचेवरी । केवळ आपल्या प्रित्यर्थ ।।३७।।

इकडे शेगांव सुनें पडलें । प्रेतवत्  दिसूं लागलें ।

मुखीं तेज नाहीं उरलें । मुळींच पाटील मंडळीच्या ।।३८।।

शेगांवीचे पुष्कळ जन । आले नागपुरा जाऊन ।

परि न झालें दर्शन । समर्थांचे कोणाला ।।३९।।

चौक्या पहारे सभोंवार । कडेकोट होते फार ।

समर्थांच्या पायांवर । शीर ठेवणे मुष्कील झालें ।।१४०।।

नागपूराहून आपणाला । आणण्या हरि पाटील निघाला ।

दहा पांच संगतीला । भक्त घेऊन शेगांवचे ।।४१।।

आला सिताबर्डीसी । गोपाळ बुटीच्या सदनाशी ।

तो तेथे दारापाशीं । शिपाई पाहिले दोन चार ।।४२।।

शिपायांनी पाटलाला । जरी होता अटकाव केला ।

परि तो न त्यांनी जुमानिला । बळकट होता म्हणून ।।४३।।

हरि पाटील शिरला आंत । गडबड झाली तेथ बहुत ।

तुम्ही धावून त्याचा हात । धरिलात कीं प्रेमानें ।।४४।।

जैसे वासरासी पाहतां । गाय धावे पुण्यवंता ।

तैसेच तुम्ही समर्था । केलेंत घरी बुटीच्या ।।४५।।

गोपाळ बुटी धांवत आले । हरि पाटला विनविते झाले ।

पाटील माझें ऐकलें । पाहिजे तुम्ही थोडेसें ।।४६।।

भोजनोत्तर समर्थाला । जा घेऊन शेगांवाला ।

तो आहे भक्तीस विकला । शेगांवकरांच्या नि;संशय ।।४७।।

सर्वाचे झाल्या भोजन । आपण निघाला तेथून ।

आशीर्वाद तो देऊन । गोपाळ बुटीच्या कुटूंबाला ।।४८।।

त्या पाटील हरिवरी । कृपा आपुली अत्यंत खरी श्रीकल्याणस्वामीपरी । सेवेस आपुल्या तत्पर जो ।।४९।।

हरि पाटलाकारण । स्वामी तुमचे द्वयचरण ।

हेंच महानिधान । जोडलें  ऐसें वाटतसे ।।१५०।।

धार कल्याणचे रंगनाथ । आले तुम्हां भेटण्याप्रत ।

गुरुराया या शेगांवात । शेगांवचे भाग्य मोठें ।।५१।।

श्रीवासुदेवानंद सरस्वती । जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति ।

ऐशा जगमान्य विभूति । आल्या आपल्या दर्शना ।।५२।।

जरी आपण देह ठेविला । तरी पावतसा भाविकाला ।

याचा अनुभव रतनसाला। आला आहे दयानिधे ।।५३।।

रामचंद्र कृष्णाजी पाटील । भक्त तुमचा प्रेमळ ।

त्याची तुम्ही पुरविली आळ । गोसाव्याच्या रुपानें ।।५४।।

तैसेच  बोरीबंदरावरी । जांजळ जो कां लक्ष्मण हरी ।

त्याला भेट दिली खरी । परमहंसरुपानें ।।५५।।

तुमच्या लिलेच्या तो पार । कोणा न लागे तिळभर ।

मुंगी मेरुमांदार । आक्रमण कैशी करी ।।५६।।

टिटवीच्याने सागर । शोषवेल का साचार ।

दासगणू हा लाचार । आहे सर्व बाजूने ।।५७।।

आपली वर्णण्या लीला । महाकवीच पाहिजे झाला ।

मजसारख्या घुंगुरडयाला । ते साधणे कठीण ।।५८।।

परि जो का असे परिस । तो सुवर्ण करी लोखंडास ।

उरवी न त्याच्या ठायीं दोष । लोहपणाचा येतुला हो ।।५९।।

आपुली लीला कस्तुरी । मम वाणी मृत्तिका खरी ।

परि मान पावेल भूमिवरी । सहवासें या कस्तुरीच्या ।।१६०।।

माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून तुमचे पाहिले चरण ।

आतां न द्यावे लोटून । परत दासगणूला ।।६१।।

सर्वदा सांभाळ माझा करा । दैन्यदुःखातें निवारा ।

भेटवा मशीं शारंगधरा । भक्त बापुन्याच्यापरी ।।६२।।

आपल्या कृपेकरुन । सानंद राहो सदा मन ।

सर्वदा घडो हरिस्मरण । तैसीच संगत सज्जनांची ।।६३।।

अव्याहत वारी पंढरीची । मम करे व्हावी साची ।

आवड सगुण भक्तीची । चित्ता ठायीं असूं द्या ।।६४।।

अंत घडो गोदातीरीं । यावीण आशा नाहीं दुसरी ।

स्मृती राहो जागृत खरी । भजन हरींचें करावया ।।६५।।

भजन करितां मोक्ष घडो । देह गोदातीरीं पडो ।

सद्वत्कांसी स्नेह जडो । दासगणूचा सर्वदा ।।६६।।

मागितले तें मला द्यावे । तैसे लोकांचेही पुरवावे ।

आर्त गुरुवरा मनोभावे । जे या स्तोत्रा पठतील ।।६७।।

या स्तोत्राचा पाठ जेथ । भाव होईल तेथ तेथ ।

तेथें न राहो कदा दुरित । इतुलेही दयाळा ।।६८।।

स्तोत्रपठकां उत्तम गती । तैशी संतती संपत्ती ।

धर्मवासना त्याच्या चित्तीं । ठेवा जागृत निरंतर ।।६९।।

भूतबाधा भानामती । व्हावी न स्तोत्रपठकांप्रती ।

लौकिक त्याचा भूवरती । उत्तरोत्तर वाढवावा ।।१७०।।

हे स्तोत्र ना अमृत । होईल अवघ्या भाविकांप्रत ।

येईल त्याचीप्रचीत । सद्वाव तो ठेविल्या ।।७१।।

मोठयानें करुन गर्जना । बहावें साधू गजानना ।

शेगांवचा योगीराणा । सर्वदा पावो तुम्हातें ।।७२।।

सद्गुरुनें चित्तास । पहा माझ्या करुन वास ।

बोलविलें या स्तोत्रास । तुमच्या हिताकारणे ।।७३।।

यातें असत्य मानल्यास । सुखाचा तो होईल नाश ।

भोगीत रहाल संकटास । वरचेवर अभक्तीनें ।।७४।।

अभक्ती ती दूर करा । गजाननाशी मुळीं न विसरा ।

त्याच्या चरणीं भाव धरा । म्हणजे जन्म सफल होई ।।७५।।

स्तोत्र पठकांची आपदा । निमेलकीं सर्वदा ।

दृढ चित्तीं धरा पदां । गजानन साधूच्या ।।७६।।

वाचें म्हणता गजानन । व्याधी जातील पळून ।

जैसे व्याघ्रा पाहून । कोल्हें लांडगे पळती की ।।७७।।

स्तोत्रपठका भूमीवरी । कोणी न राहील पहा वैरी ।

अखेर मोक्ष त्याच्या करी । येई कीं नि:संशय ।।७८।।

शके अठराशें अडुसष्टांत । श्रीक्षेत्र शेगांवात ।

समाधीपुढे मंडपांत । रचियेलें स्तोत्र पहा ।।७९।।

फाल्गून वद्य एकादशी । मंगळवार होता त्या दिवशीं ।

स्तोत्र गेले कळसासी । गजाननाच्या कृपेने ।।१८०।।

शांति शांति त्रिवार शांति । असो या स्तोत्राप्रती ।

स्वामी गजानन गुरुमुर्ती । आठवा म्हणे दासगणू ।।१८१।।

।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।। शुभं भवतु ।।

।। इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त ।।


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.