karpur hom कर्पूर होम म्हणजे काय ?
karpur hom
karpur hom कर्पूरहोम केव्हा केव्हा करतात
कर्पूरहोम’ हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण, अतिप्रभावशाली व अत्यंत उपयुक्त, पण आजपर्यंत फारच कमी लोकांना माहीत असलेला असा हा विधी आहे. कर्पूरहोमाची संकल्पना
कर्पूरहोमामध्ये, शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर कापराची वडी प्रज्वलित करतात. हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसून आपण यज्ञ करत आहोत अशी कल्पना ह्या वेळी केली जाते. कारण नारळातील पाणी बाह्य वातावरणाशी संपर्करहित असल्यामुळे ते हरिद्वार येथील ब्रह्मकुंडातील गंगेप्रमाणेच पूर्णतया प्रदूषणरहित, स्फटिकासारखे शुद्ध व पवित्र असते. त्याचप्रमाणे नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडाचा गंगाकाठ मानला जातो. ज्याप्रमाणे ब्रह्मकुंडावर यज्ञयाग केल्यास त्याचे फळ कोटीपट मिळते अशी श्रद्धा आहे, त्याप्रमाणे कर्पूरहोमाचे फळही असेच भरघोस असते. कारण मनःपूर्वक कर्पूरहोम करताना वरील दोन्ही अत्यंत पवित्र गोष्टींबरोबरच परमपावन अशा अग्नीचा संयोग झाल्यास त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढून इच्छाशक्ती तीव्र होते व त्या कठोर
इच्छाशक्तीमुळे मनःकामना पूर्ण होण्यास साहाय्य होते. त्याबरोबरच मनात विचारांचे काहूर उठले असेल तर त्यांचे शमन होऊन मनास अनामिक शांती लाभते. कर्पूरहोम केव्हा करावा ?
कर्पूरहोम कोणत्याही वेळी करता येतो.
तथापि दररोज ठरावीक वेळ ठेवल्यास आपण आवाहित करत असलेली देवता नेमकी त्या वेळी उपस्थित असल्याचे जाणवते. कर्पूरहोमामुळे घरात शांती नांदते. एखाद्या महत्त्वाच्या कार्याला निघण्यापूर्वी कर्पूरहोम अवश्य करावा. त्यामुळे त्या कार्याच्या सिद्धीसाठी आवश्यक ते मनः स्थैर्य व विवेकबुद्धी ह्या गोष्टी जागृत राहतात आणि कार्यात यश असेल तरच त्या ठिकाणी जावे असे वाटते, ह्याउलट कार्यहानी होणार असेल तर तेथे न जाण्याची मनास प्रेरणा होते. ह्याखेरीज ज्या वेळी पर्याय शोधताना बुद्धीला शीण होतो व नक्की निर्णय घेता येत नाही, अशा वेळी कर्पूरहोम अवश्य करावा. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीस घर खरेदी करावयाचे आहे तिला त्यास एकदम दोन-तीन चांगली घरे दृष्टिपथात येतात किंवा एखाद्या उपवर मुलीस एकदम दोन-तीन चांगल्या स्थळांकडून होकार येतो, तसेच एकाच वेळी दोन मनपसंत नोकऱ्यांची नेमणूकपत्रे येतात; अशा वेळी ‘हे करू की ते करू’ अशी मनाची दोलायमान अवस्था होते. एखाद्याचा सल्ला घ्यायला जावे तर सल्ला देणारी व्यक्ती निरपेक्षपणे सल्ला देईल ह्याची खात्री नसते. प्रत्येक जण सल्ला देताना स्वतःकडे जोखीम न घेता दुय्यम मत (सेकंड ओपिनिअन) देतो. कारण सल्ला चुकल्यास त्याचा वाईटपणा स्वतःकडे घेण्यास कुणीच तयार नसतो. काळाची पावले अचूक ओळखणाऱ्या एखाद्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तर अशी व्यक्ती अभावानेच आढळते. ह्या सर्व पेचप्रसंगी कर्पूरहोमासारखा उत्कृष्ट पर्याय नाही. कर्पूरहोम करून थोडा वेळ शांत बसल्यावर मनाची स्थिरता होऊन त्यात आपल्याला श्रेयस्कर पर्यायाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे कुणाचाही सल्ला न घेता स्वतःहून योग्य पर्यायी मार्ग काढता येतो.
कर्पूरहोम करताना विशेष असा कोणताही मंत्र अथवा स्तोत्र पठन करणे आवश्यक असते असे नाही.
तथापि आपली इष्टदेवता वा कुलदेवता ह्यांचे नामस्मरण केल्यास, किंवा आपल्यास माहीत असलेल्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठन केल्यास कर्पूरहोमामध्ये अधिक एकाग्रता साधली जाते. ज्या वेळी शोक, दुःख, अपमान इत्यादी भावना उफाळून म हताश होते, त्या वेळी कर्पूरहोम केल्यास नैराश्य दूर पळते आणि मनाला दुप्पट उत्साह व उमेद वाटून पुढील कार्ये सुकर ठरतात. एखादे मोठे धर्मसंकट समोर येताच कर्पूरहोम केल्यास अनाकलनीयरीत्या मार्ग सुचतो. जात, धर्म, लिंग, वय, अवस्था, अशौच इत्यादी कोणत्याही गोष्टींचा अडथळा कर्पूरहोमास येत नाही.
संकटकाळी हातपाय धुऊन केलेली किमान शारीरिक शुचिता कर्पूरहोमास पुरेशी ठरते. कर्पूरहोम शक्यतो देवासमोर करावा. देवाकडून योग्य निर्णय वा पर्याय हवा असेल तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे करावी. आत्मनिवेदन, पश्चात्तापनिवेदन, ध्यानधारणा, त्राटक इत्यादी करताना शेंडी आपल्याकडे करावी. कर्पूरहोम करताना अपेक्षित फलनिष्पत्ती होईपर्यंत एकाच नारळावर दररोज कर्पूरहोम करता येतो. त्या वेळी नारळावर एकाच जागी कापूर लावण्याऐवजी जागा बदलली तरी चालते. त्यामुळे एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत वापरता येतो. तथापि काही दिवसांनी त्यातील पाणी आटल्यावर तसेच अमावस्या, पौर्णिमा ह्या तिथींना वा नारळ भग्न पावल्यास त्या जागी नवीन नारळ घ्यावा. पहिला नारळ प्रसाद म्हणून भक्षण करता येतो. नारळ नासलेला असेल तर त्याचे विसर्जन करावे.
कर्पूरहोमाचा विनियोग
१) पापमोचन, २) संकटपरिहार, ३) दोषनिरास ह्या उद्दिष्टांसाठीही केला जातो. एखादे वाचिक, मानसिक वा कायिक पाप घडले असेल तेव्हा पापमोचनासाठी कर्पूरहोम करताना, हातात कापराची एक वडी घेऊन आपल्या पापाचा मनोमन उच्चार करून ते पापकृत्य कापराच्या वडीत समाविष्ट झाल्याची कल्पना करावी व ती वडी नारळावर ठेवून प्रज्वलित करावी. जेव्हा मन पश्चात्तप्त होऊन पापकृत्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी ग्वाही देते, त्या क्षणी पापमोचनार्थ कर्पूरहोम थांबवावा. दुसरे उद्दिष्ट म्हणजे संकटपरिहार होय. ज्या वेळी अनाकलनीय व अत्यंत दुर्धर असे पेचप्रसंगात्मक संकट (किंवा समस्या) समोर येते, त्या वेळी हातात कापराची वडी घेऊन त्या संकटाचा (किंवा समस्येचा) मनोमन उच्चार करून ते संकट (किंवा समस्या) त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर ठेवून प्रज्वलित करावी. संकटनिराकरणाचा योग्य मार्ग दिसताच संकटपरिहारात्मक कर्पूरहोम थांबवावा. तिसरे उद्दिष्ट म्हणजे दोषनिरास होय. जेव्हा आपल्या अंगी परस्त्रीचिंतन, परद्रव्यापहरण, परनिंदा, परानिष्टचिंतन, दुर्व्यसन, कामक्रोधादी विकार इत्यादींचा फैलाव आहे अशी जाणीव होऊ लागते तेव्हा क्रमाक्रमाने एकेक दोष निवडावा व हातात कापराची वडी घेऊन त्या दोषाचा मनोमन उच्चार करून तो त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर लावावी. तो दोष निरस्त झाल्याची खात्री होईपर्यंत दोषनिरासात्मक कर्पूरहोम करावा. अशा प्रकारे अंगातील सर्व दोष कर्पूरहोमाने नष्ट करता येतात. वरील तीन उद्दिष्टापैकी
संकटपरिहारार्थ कर्पूरहोम करताना नारळाची शेंडी देवाकडे करावी. पापमोचनार्थं व • दोषनिरासार्थ कर्पूरहोम करताना नारळाची शेंडी आपणाकडे करावी. उद्दिष्टांसाठीही एकाच बैठकीवर, एकाच नारळावर कर्पूरहोम करता येतो. एकाहून वरील तीन उद्दिष्टांखेरीज कामनापूर्ती होण्यासाठी कर्पूरहोम करता येतो. हातात कापराची वडी घेऊन आपल्या कामनेचा मनोमन उच्चार करून त्या कामनापूर्तीतील विविध अडथळे त्या वडीत सामावल्याची भावना करून नारळावर ती वडी प्रज्वलित करावी. त्या वेळी नारळाची शेंडी देवाकडे करावी. ह्याप्रमाणे दररोज ठरावीक संख्येने कर्पूरहोम केल्यास काही दिवसांत आपल्या कामनापूर्तीसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याविषयीचे मार्गदर्शन मिळते.
कर्पूरहोमातील काही समस्यांचे निराकरण
काही वेळा कर्पूरहोम करताना नारळ एकदम तडकतो किंवा त्याची दोन शकले होतात. अशा वेळी लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूरहोम करावा. एखादे स्तोत्र वा ठरावीक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकल्यास ते स्तोत्र वा ती संख्या पूर्ण करावी व नंतर नारळ बदलावा. तडकलेला नारळ खाण्यास योग्य असल्यास त्याचा उपयोग घरात करावा, अन्यथा त्याचे विसर्जन करावे. कधीकधी कर्पूरहोमासाठी नारळ घेतानाच तो तडकतो. अशा वेळी मनःशांती ढळू न देता दुसरा नारळ घ्यावा. जेव्हा संचित-प्रारब्ध-क्रियमाण कर्मांनी उद्भवलेल्या प्रतिरोधाचा (विरोधांचा) रेटा अधिक प्रमाणात असतो तेव्हा त्याची परिणती नारळ तडकण्यात होते. नारळ तडकणे बंद होणे म्हणजे प्रतिरोध संपणे असे सूचित होते. काही वेळा कर्पूरहोम करताना नारळाच्या एका, दोन्ही किंवा तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहू लागते. एका डोळ्यातून पाणी वाहते तेव्हा सामान्य अडचण, दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा उपाययोजना करता येण्याजोगी समस्या व तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा अत्यंत कठीण पेचप्रसंग सूचित होतो. अशा वेळी नारळ बदलून, नारळाची शेंडी देवाकडे करून, मनाचे धैर्य राखून योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूरहोम चालू ठेवावा.
नेहमीच्या यज्ञकर्मास कर्मकांडाचे अधिष्ठान असते, तर कर्पूरहोमास साधनेचे व श्रद्धेचे अधिष्ठान असते. उपरोक्त दोन्हींची अंतिम फलश्रुती ही कामनापूर्ती असली तरी कर्पूरहोम हा यज्ञाचा पूर्णतया पर्याय होऊ शकत नाही. तथापि सर्वसामान्यांना नित्य यज्ञकार्य सहजशक्य नसल्यामुळे त्यांना कर्पूरहोमातून यज्ञ केल्याचे समाधान तर मिळतेच, पण त्याचबरोबर श्रद्धेचे फळही मिळते.









अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.