मित्रांनो, हल्ली आपल्या कानावर पंचतत्त्वे/पंचमहाभूते हे शब्द नेहमी
पडत असतात. मग काय आहेत ती पंचतत्त्वे व त्याचा काय परिणाम आपल्यावर व
आपल्या वास्तूवर होतो, हे आपण या प्रकरणात बघणार आहोत. संपूर्ण सजीव सृष्टीची
निर्मिती ही पंचमहाभूतांपासून झालेली आहे. आपले शरीर ज्या हाडामासापासून
बनलेले आहे ते देखील हे या पंचतत्त्वानी बनलेले आहे. त्यामुळे त्या गोष्टींची माहिती
आपल्याला वास्तूशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी असणे खूप आवश्यक आहे. सृष्टी ह्या
पाच तत्त्वांमुळे टिकून आहे. १) पृथ्वी २) आप (जल) ३) तेज (अग्नी) ४) वायू
आणि ५) आकाश ह्या पाच तत्त्वांनी निर्माण झालेली आहे. त्यांच्यात असलेल्या गुणधर्मामुळे त्यांना ही नांवे देण्यात आलेली आहेत व तशीच रचना ही मनुष्याची आहे.
मनुष्याच्या शरीरात ही तत्त्वे कार्यान्वित असतात. ज्याप्रमाणे माती आणि
पाणी एकत्र आले की, चिखलाचा गोळा तयार होतो; त्याचप्रमाणे पृथ्वी आणि
पाणी एकत्र आले की, शरीरात कफ तयार होतो. त्यामुळे आयुर्वेदात सांगितले आहे
की, ज्या व्यक्तींना कफ असतो त्यांनी पाणी हे कमी प्रमाणात प्यावे.
अग्नीपासून शरीरात पित्ताची निर्मिती होते, तर वायू आणि आकाश यापासून वात निर्माण होतो.
वातावरणात असलेली पंचतत्त्वे व तुमच्या शरीरात असलेली पंचतत्त्वे यांचा खूप मोठा
संबंध आहे. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे आपल्या शरिरात देखील वारंवार बदल
होतांना आपण बघत असतो. पंचमहाभूतांपैकी पृथ्वीमध्ये प्रचंड चुंबकीय शक्ती
असल्यामुळे त्याचा वातावरणीय लहरींवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो.
त्याचप्रमाणे पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ह्या सर्व गोष्टींचा सृष्टीवर खूप मोठा
परिणाम होत असतो.
ह्या पाचतत्त्वांपैकी कोणत्याही एका तत्त्वात बिघाड झाला किंवा
अतिरेक झाल्यास पृथ्वीवर भूकंप, जलप्रलय, अग्नितांडव पाहण्यात येते. वातावरणात
होणाऱ्या या बदलांचा प्रत्येक मनुष्यावरच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीवर परिणाम
होताना आपण वारंवार बघत असतो. मग त्याची तीव्रता कुठे कमी कुठे जास्त या
प्रमाणात दिसून येते. या सर्व वातावरणीय बदलांचा अभ्यास करून मनुष्याने त्याची
ऋतूंमध्ये विभागणी केली व त्यानुसार त्याने कोणत्यावेळेस कोणती वातावरणीय
तत्त्वे ही जास्त प्रमाणात कार्यान्वित असतात याचा संपूर्ण अभ्यास करून उन्हाळा,
हिवाळा, पावसाळा ह्या ऋतूंमध्ये विभागणी केली. भारतामध्ये आपणास तीनही
ऋतूंचा आनंद घेता येतो. काही भागांत आपणास दोन ऋतू बघण्यात येतात.

त्यानुसार मनुष्याने पृथ्वीवर त्यास अनुकूल असणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेऊन
आपल्या सोयीनुसार त्यात कालपरत्त्वे बदल केले. पूर्वी मनुष्य संपूर्णतः निसर्गाच्या
सान्निध्यात राहात असल्याकारणाने ती वातावरणीय पंचतत्त्वे ही मनुष्याला पूर्णपणे
मिळत असत. त्यानंतर माणूस जसजसा प्रगत होत गेला, लोकसंख्या वाढत गेली,
जमिनीच्या वाढत्या किमती त्यामुळे वास्तू घेणे व वास्तूशास्त्रानुसार वास्तू मिळणे
तसे अवघड झाले. हल्ली प्रत्येकजण आपआपल्या घरात/वास्तूत राहतो.
आपल्या शरिरात जशी ही पंचतत्त्वे कार्यान्वित असतात, तशीच ती आपल्या वास्तूतदेखील
कार्यान्वित असतात; परंतु आजकाल ज्या ऊर्जा आपणास ज्या दिशेतून मिळावयास
हव्यात तशा त्या आपणास मिळत नाहीत. मग बऱ्याचदा असे होते की, आपली
वास्तू मोठी असते, पण वास्तूमध्ये मिळणाऱ्या ऊर्जा ह्या शून्य असतात. मग काय
होते अशा वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीत सतत आजारपण दिसून येणे, चिडचिडेपणा
दिसून येणे, विनाकारण कटकटी निर्माण होणे अशा प्रकारच्या समस्या अशा वास्तूत
प्रामुख्याने दिसून येतात.
मग ज्यावेळेस आपण बाहेर फेरफटका मारायला एखाद्या
गार्डनमध्ये जातो, मंदिरात जातो त्यावेळेस तेथील वातावरणीय ऊर्जेने आपणास प्रसन्न
वाटते व त्या ऊर्जा घेऊन आपल्याला घरी आल्यानंतर प्रसन्न वाटते. आपणास जेव्हा
कंटाळा येतो तेव्हा आपण स्मशानात जातो का, तर नाही; कारण तेथील वातावरण
व तेथे निर्माण असलेल्या ऊर्जा ह्या माणसाला नकारात्मकता, नैराश्य देणाऱ्या व
अशांत करणाऱ्या असतात. ज्यावेळेस आपण वास्तूचा विचार करतो त्यामध्येदेखील
वातावरणीय बदलांचा खूप मोठा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे घरात कधीआपणास प्रसन्नता, तर कधी कंटाळा येतो. जर तुमच्या वास्तूत ती पंचतत्त्वे योग्य प्रमाणात येत असतील तर, वास्तूत राहणारी व्यक्ती, सजीव प्राणी निरोगी, प्रसन्न व
आनंदी राहील त्यामुळे ती पंचतत्त्वे योग्य दिशेतून व योग्य भागातून येणे व जाणे हे
खूप महत्त्वाचे असते.
आज मनुष्याने वैज्ञानिक प्रगती मोठ्या प्रमाणावर केली, पण
त्याचबरोबर या सृष्टीने बनविलेल्या या पंचतत्त्वाचे आपण नुकसान करीत चाललो
आहोत हे मात्र नाकारता येत नाही. आज माणूस निसर्गाची पायमल्ली करीत चालला
आहे. त्यामूळे आज आपण बघतो की, वाढते वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वाहते
नाले जे आज आपण नद्यामध्ये, समुद्रामध्ये सोडले आहे त्यामूळे पाणी प्रदूषण व
त्यातून निर्माण होणाऱ्या विपरीत परिणामामुळे या नैसर्गिक पृथ्वी, आप, तेज,
आकाश, वायू या सर्व तत्त्वांचा आपण -हास करित चाललो आहोत.
आज जगभरातून मोठमोठ्याला कारखान्यांमधून विषारी वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे ओझोनचा
असलेला थर हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. पावसाच्या अनियमितता व
कमतरता यामूळे पाण्याची भीषणता त्यामूळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी
होत आहे. तर एकीकडे वाढलेल्या तापमानामुळे समुद्राची पातळी, पृथ्वीची दाहकता
वाढत चालली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज आपण बघतो की, या आधुनिक,
वैज्ञानिक व प्रगतशील युगातदेखील आपणास असंख्य रोगांना सामोरे जावे लागत
आहे.
नवनवीन व्हायरस / विषाणूमुळे संपूर्ण जग आज त्रस्त झाले आहे व ती सृष्टीच
आज आपणास संपवत चालली आहे असे म्हणावे लागेल. आज आपण बाहेर जाऊन
मोकळा श्वास घेऊ शकत नाही. निसर्गाने आपल्याला ज्या गोष्टी फुकट दिल्या त्या
आज आपल्याला विकत घेण्याची वेळ येत आहे. ऑक्सिजन, पाणी, अन्न यासाठी
माणसाची वणवण चालली आहे. माणसाने आजही या गोष्टीचे गांभीर्य ओळखले नाही
आणि त्यापासून जर आपण अज्ञानी राहिलो तर मात्र ही पंचतत्त्वे जी संपूर्ण सजीव
सृष्टीसाठी संजीवनी आहेत तीच येणाऱ्या भविष्यकाळात पंचमहाराक्षस म्हणून संपुर्ण
जीवसृष्टीला गिळणार यात शंका नाही.
